कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल संपूर्ण माहितीबहुजनांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून केले. शिक्षण आणि श्रम यांची सांगड घालून सक्षम पिढी घडवण्याचा आदर्श त्यांनी निर्माण केला. विद्यार्थ्यांना कमवा आणि शिका हा मूलमंत्र देणारे शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल संपूर्ण माहिती
भाऊरावांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी एका जैन कुटूंबात झाला. त्यांचे वडिल इस्ट इंडिया कंपनीत लिपिक म्हणून नोकरीस होते.
सांगली जिल्ह्यातील ऐतवडे बुद्रुक हे त्यांचे मूळ गाव होय. त्यांच्या पणजोबांचे नाव देवगौडा, वडिलांचे नाव पायगौडा तर आईचे नाव गंगाबाई असे होते.भाऊरावांचे प्राथमिक शिक्षण कुंभोज, दहिवडी, विटे इत्यादी ठिकाणी झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची राहण्याची सोय जैन बोर्डिंगमध्ये करण्यात आली होती. याच काळात त्यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव पडला. पुढील काळात भाऊराव पाटील साताऱ्यात जाऊन शिकवण्या घेऊ लागले. याच काळात त्यांनी मदवानमास्तर, भाऊसाहेब कुदळे, नानासाहेब येडेकर आदि मंडळींबरोबर दुधगावात ‘दुधगाव शिक्षण मंडळ’ स्थापन केले. याच संस्थेमार्फत सर्व जातिधर्मांच्या मुलांसाठी एक वसतिगृहही त्यांनी सुरू केले. रयत शिक्षण संस्थेचे बीज येथेच रोवले गेले. पुढे त्यांनी ओगल्यांच्या काच कारखान्यात व किर्लोस्करांच्या नांगराच्या कारखान्यात काही काळ काम केले. याच काळात त्यांचा सत्यशोधक समाजाच्या कार्याशी जवळून संबंध आला. त्यांच्यावरील महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. महात्मा फुले यांना गुरू मानूनचमहाराष्टाच्या जनतेने भाऊराव पाटलांचा कर्मवीर ही पदवी देऊन गौरव केला. तसेच भारतीय केंद्रशासनाने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले. पुणे विद्यापीठाने त्यांचा इसवी सन १९५९मध्ये सन्माननीय डी. लिट. ही पदवी दिली होती.भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून ‘कमवा व शिका’, ‘श्रम करा व शिका’ हा मंत्र विद्यार्थ्यांना दिला.कर्मवीर भाऊराव पाटील हे जोतीराव फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे महत्त्वाचे सदस्य होते.
सातारा जिल्ह्यातील काले या गावी दिनांक ४ ऑक्टोबर १९१९ रोजी भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली.
भाऊरावांनी केवळ क्रमिक शिक्षणच नव्हे, तर समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी आदि मूल्यांची शिकवण विद्यार्थ्यांना दिली.
२५फेब्रुवारी १९२७ रोजी महात्मा गांधींच्या हस्ते या वसतिगृहाचे श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाउस असे नामकरण केले गेले.
१६ जून १९३५ रोजी रयत शिक्षण संस्था नोंदणीकृत (रजिस्टर) झाली. याच साली सातार्यात भाऊरावांनी ‘सिल्व्हर ज्युबिली ट्रेनिंग कॉलेज’ सुरू केले.
भाऊरावांनी महाराजा सयाजीराव हायस्कूल या नावाने देशातले ‘कमवा आणि शिका’ या पद्धतीने चालणारे पहिले फ्री ॲन्ड रेसिडेन्शियल हायस्कूल सुरू केले.
इ.स. १९४७ साली भाऊराव पाटलांनी साताऱ्यात छत्रपती शिवाजी कॉलेजची, तर इ.स. १९५४ साली कऱ्हाड येथे सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजची स्थापना केली.
शाळा व महाविद्यालयांसाठी प्रशिक्षित शिक्षकांची उणीव जाणवू लागली, म्हणून त्यांनी प्रथम महात्मा फुले अध्यापक विद्यालय व पुढे इ.स. १९५५ मध्ये सातारायेथे मौलाना आझाद यांच्या नावाने आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सुरू केले.
रयत शिक्षण संस्थेची उद्दिष्टे
शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गात शिक्षणाची आवड निर्माण करणे व ती वाढवणे
मागासलेल्या वर्गांतील गरीब मुलांना मोफत शिक्षण देणे
निरनिराळ्या जातिधर्मांतील विद्यार्थ्यांत प्रेमभाव निर्माण करणे
अयोग्य रूढींना फाटा देऊन खर्या विकासाचे वळण लावणे
संघशक्तीचे महत्त्व जरूर तर कृतीने पटवून देणे
सर्व मुले काटकसरी, स्वावलंबी, शीलवान व उत्साही बनवण्याचा प्रयत्न करणे
बहुजन समाजाच्या शिक्षण प्रसारासाठी जरूर पडेल तसे संस्थेचे कार्यक्षेत्र वाढवणे......कर्मवीर भाऊराव पाटील यांचे संस्थात्मक योगदान
दूधगाव शिक्षण प्रसारक मंडळ
रयत शिक्षण संस्था
छत्रपती शाहू व नेर्ले कार्ले बोर्डिंग वसतिगृह
शिवाजी शिक्षण संस्था सातारा
युनियन बोर्डिंग हाऊस
सिल्व्हर ज्युबिली रूरल ट्रेनिंग कॉलेज व महात्मा फुले अध्यापक विद्यालय
प्राथमिक शिक्षण समिती
महाराजा सयाजीराव गायकवाड फ्री अँड रेसिडेन्शिअल स्कुल
जिजामाता अध्यापिका विद्यालय
लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शिक्षणोत्तेजक पतपेढी
विजयसिग वसतिगृह
आझाद कॉलेज ऑफ एजुकेशन
महात्मा गांधी वसतिगृह
छत्रपती शिवाजी कॉलेज व सद्गुरू महाराज कॉलेज
टिप्पण्या