दहावी, बारावीच्या पोरांना दुसरीतले वाचता येईना ; तीन अंकी संख्येला एक अंकी संख्येने भागता येईना!!
भारतातील ग्रामीण भागातील 14 ते 18 वयोगटातील 25% विद्यार्थ्यांना इयत्ता दुसरी दर्जाचे वाचता येत नाही. हा वाचन न येण्याचा प्रकार त्यांच्याच प्रादेशिक भाषेतील आहे. तसेच याच वयोगटातील निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांना तीन अंकी संख्येला एक अंकी संख्येने भागता येत नाही.शालेय शिक्षणाच्या संदर्भातील ही आकडेवारी आहे यंदाच्या असर अहवालातील. प्रथम या संस्थेकडून भारतातील शिक्षणाच्या स्थितीसंदर्भात असलेला अहवाल आज प्रकाशित केला गेला. ASER (Annual Status of Education Report 2023) या नावाने प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालातील आकडेवारी पाहता शिक्षणविषयक सुधारणांकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे. 2023 या वर्षीचा असर अहवाल भारतातील 26 राज्यांच्या 28 जिल्ह्यांतील सर्वेक्षणावर आधारित आहे. हे सगळे जिल्हे ग्रामीण भागातील असून एकूण 34,745 विद्यार्थी यांच्यावर आधारित हा अहवाल तयार केला आहे. यावर्षीचा असर अहवाल तयार करताना चार घटकांचा विचार करण्यात आला आहे. ते पाच घटक म्हणजे,
1) मूलभूत वाचन क्षमता (प्रादेशिक भाषेतील)
2) गणित व इंग्रजी विषयाचे ज्ञान
3) मूलभूत कौशल्ये व त्यांचा रोजच्या जगण्यातील वापर
4) रोजच्या वापरातील सूचना फलक यांचे वाचन व आकलन तसेच आर्थिक आकडेमोड समज.
या चार घटकांवर आधारित सर्वेक्षण करून यावर्षी अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. त्यातून या धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. 14 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचा विचार करता 57.3% विद्यार्थी इंग्रजी वाचतात मात्र त्यापैकी 76% विद्यार्थ्यांना त्याचा अर्थ समजत नाही अशी गत आहे. यातही लिंगभेदकरता 57.3% विद्यार्थी इंग्रजी वाचतात मात्र त्यापैकी 76% विद्यार्थ्यांना त्याचा अर्थ समजत नाही अशी गत आहे. यातही लिंगभेद प्रकर्षाने दिसून येत आहे. वाचनाच्या बाबतीत पाहता मुलांच्या तुलनेत अधिक मुलींना वाचता येत आहे. मुलींचे प्रमाण 76% आहे तर मुलांचे प्रमाण 70% आहे. गणितीय आकडेमोड व इंग्रजी वाचन याबाबतीत मुलांचे प्रमाण जास्त आहे.
विद्यार्थ्यांमधील डिजिटल साक्षरता
14 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये 90% हून अधिक मुलांच्या घरी स्मार्टफोन उपलब्ध आहे. स्मार्ट फोन केवळ उपलब्धच नाही तर तो व्यवस्थितरीत्या त्यांना हाताळता देखील येत आहे. मात्र यात देखील मुलींचे प्रमाण मुलांच्या तुलनेत कमी आहे. नव्या युगाचे नवशिल्पकार असणारी ही पिढी सोशल मीडियावर देखील तेवढीच सक्रिय आहे. या वयोगटातील 90.5% विद्यार्थी सोशल मिडीयाचा वापर करत आहेत. यामध्ये देखील मुलींचे प्रमाण कमी आहे. सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी त्यातील केवळ निम्म्याच जणांना सोशल मीडियावर सुरक्षेसंदर्भातील ‘सेटिंगचे’ ज्ञान आहे किंवा त्याबाबत ते जागरूक आहेत. 80% विद्यार्थी मोबाईलचा वापर हा मनोरंजनासाठी करतात. चित्रपट पाहणे, गाणी ऐकणे यांसारखे मनोरंजन ते मोबाईलद्वारे करतात अशी माहिती या अहवालातून समोर आली आहे.