**बार्शी नगरपरिषदेतील लिपिकांवर पदाचा गैरवापर केल्याचा आरोप; आरोग्य कर्मचाऱ्याच्या पत्नीचा आत्मदहनाचा इशारा**

**बार्शी नगरपरिषदेतील लिपिकांवर पदाचा गैरवापर केल्याचा आरोप; आरोग्य कर्मचाऱ्याच्या पत्नीचा आत्मदहनाचा इशारा** 

**KDM NEWS प्रतिनिधी**बार्शी, २० जून २०२५ – प्रतिनिधी
बार्शी नगरपरिषदेमधील काही लिपिकांच्या मनमानी कारभारामुळे अन्यायग्रस्त झाल्याचा आरोप करत, भिमनगर परिसरातील सौ. निता प्रकाश शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे थेट तक्रार दाखल करत प्राणांतिक उपोषण आणि आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. नगरपरिषदेच्या प्रशासनाने विवाह प्रमाणपत्र थांबवणे, कागदपत्रे बनावट ठरवणे आणि नियुक्तीवर अडथळा आणणे या प्रकारांमुळे त्यांच्या आयुष्यावर गदा आल्याचा ठपका त्यांनी ठेवला आहे.

सौ. शिंदे यांनी सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांचे पती प्रकाश दगडू शिंदे हे बार्शी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागात १९ वर्षे सेवा बजावत होते. त्यांच्या पहिल्या पत्नीच्या निधनानंतर निता शिंदे यांच्याशी बौद्ध पद्धतीने विवाह करण्यात आला. विवाहाचे पुरावे, विवाहपत्रिका, छायाचित्रे व संमतीपत्रासह त्यांनी संबंधित कागदपत्रे सादर केली आहेत. तथापि, त्यांच्याशी संबंधित विवाह नोंदणी प्रक्रियेला नगरपरिषदेने स्थगिती दिली असून, त्या मागे हेतुपुरस्सर भूमिका असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

तक्रारीत असंही म्हटलं आहे की, नगरपरिषदेच्या मिळकत विभागातील लिपिक महादेव जनार्दन बोकेफोडे यांनी वैयक्तिक आर्थिक व्यवहाराच्या निमित्ताने श्री. प्रकाश शिंदे यांच्याकडून कोरे स्टॅम्प पेपरवर जबरदस्तीने स्वाक्षऱ्या घेतल्या आणि स्वेच्छानिवृत्तीस भाग पाडले. या कृतीमागे कोणत्यातरी अज्ञात व्यक्तीस बेकायदेशीररित्या नोकरीवर घेण्याचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

पतीच्या मृत्यूनंतर सौ. निता शिंदे यांनी वारसाहक्कातून नियुक्तीसाठी आवश्यक सर्व दस्तऐवज – शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, संगणकीय जन्म दाखला, रेशन कार्ड, संमतीपत्र – सादर केले. मात्र, लिपिक महादेव बोकेफोडे आणि आस्थापना विभागातील लिपिक रविंद्र गवळी यांनी संगनमत करून हे सर्व कागदपत्रे बनावट असल्याचे सांगून त्यांना सतत त्रास दिला. यामुळे त्यांचा मानसिक, आर्थिक छळ झाल्याचे त्यांनी आपल्या निवेदनात स्पष्टपणे मांडले आहे.

शाळा सोडल्याचा दाखला त्यांच्या मयत वडिलांनी अधिकृतरीत्या मिळवलेला असून, संगणकीय जन्म दाखल्यासही विरोध दर्शविण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. जन्म दाखल्यासारख्या अधिकृत कागदपत्रांची नोंद घेण्यास नकार दिला जाणे हे प्रशासनाच्या दुर्भावनापूर्ण वागणुकीचे उदाहरण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या अन्यायाविरोधात सौ. निता शिंदे यांनी येत्या ८ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषण करत आत्मदहन करण्याचा गंभीर इशारा दिला आहे. या प्रकाराला जबाबदार महादेव बोकेफोडे आणि रविंद्र गवळी हेच असल्याचा ठपका त्यांनी ठेवला असून, योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

त्यांच्या मते, नगरपरिषदेतील लिपिक वर्गाने पदाचा गैरवापर करत एका विधिवत विवाहित महिलेला न्याय मिळू न देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे, सदर तक्रारीची तातडीने चौकशी करून दोषींवर निलंबनासह शिस्तभंगाची कडक कारवाई व्हावी, आणि श्री. प्रकाश शिंदे यांच्या मयत झालेल्या पदावर वारसाहक्काने निता शिंदे यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सद्यस्थितीत या प्रकरणाने सामाजिक आणि कायदेशीर क्षेत्रातही खळबळ उडवली असून, नगरपरिषदेतील लिपिकांच्या बेकायदेशीर आणि अमानवी कारभारावर प्रशासनाने लक्ष घालून न्यायालयीन चौकशी व कारवाई करावी, अशी जनतेतूनही होत आहे.

#BarshiNews #JusticeForNitaShinde #MunicipalCorruption #WomenRights #SolapurNews #नोकरीवरअन्याय #शासनाकडेन्यायाचीमागणी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाने घेतला तिघांचा बळी; धाराशिवच्या बावी गावात कुटुंबाचा करुण अंत**

**बार्शीत १३ वर्षीय मुलाचे अपहरण; पोलिसांचा शोध सुरू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल