**माढा | अंजनगांव खे. येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून तणाव; दोन गटांत सामाजिक वाद, प्रशासनाने कडक पोलीस बंदोबस्त**
**माढा | अंजनगांव खे. येथे छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून तणाव; दोन गटांत सामाजिक वाद, प्रशासनाने कडक पोलीस बंदोबस्त**
**KDM NEWS प्रतिनिधी माढा** सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव खे. (खेलोबा) गावात मंगळवारी मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा अनधिकृतपणे उभारण्यात आल्याने दोन गटांमध्ये तीव्र तणाव निर्माण झाला आहे. शिवभक्तांनी गावातील मुख्य चौकात पुतळा बसवला, तर दुसऱ्या गटाने खेळोबा देवस्थानाच्या जागेवर हा पुतळा असल्याने त्याला विरोध दर्शवला. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला असून, गावात कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
घटना अशी: पहाटे साडेचारच्या सुमारास काही शिवभक्तांनी अश्वारूढ शिवरायांचा पुतळा मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ उभारला. सकाळी पाच वाजता ग्रामपंचायत पोलिस पाटील यांना माहिती मिळाल्यानंतर माढा पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सकाळी सहा वाजेपर्यंत गावकऱ्यांची गर्दी वाढली. सकाळी नऊ वाजता पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली. उपविभागीय अधिकारी ,उपअधीक्षक यांनी घटनास्थळी भेट दिली. दुपारी १२ वाजता कलम १४४ लागू करण्यात आले. दुपारी एक वाजता तीन जणांना ताब्यात घेण्यात आले. संध्याकाळी आठ वाजेपर्यंत प्रशासनाने पुतळा हटवण्याची तयारी केली. क्रेनच्या साहाय्याने पुतळा हटवण्याचा प्रयत्न सुरू असताना परिस्थिती चिघळली आणि पोलिस नियंत्रणाबाहेर गेली.
विरोधकांचा दावा आहे की, ही जागा खेळोबा देवस्थानाशी संबंधित असून, तेथे धार्मिक विधी, हंडाम नृत्य आणि ढोल-ताशा पथकाचे कार्यक्रम होतात. पुतळ्यामुळे धार्मिक कार्यात अडथळा येतो. राजाभाऊ वाघमोडे महाराज यांनी सांगितले, “खेळोबा देव आमचे कुलदैवत आहे. शिवरायांनाही आम्ही कुलदैवत मानतो. पण ही जागा मंदिराच्या प्रवेशद्वारावर येत असल्याने धार्मिक विधींना अडथळा होईल. इतर ठिकाणी पुतळा उभारण्यास आम्ही मदत करू.” मात्र, शिवभक्तांनी पुतळा कायम ठेवण्याची भूमिका घेतली आहे.
पोलिस निरीक्षक रोहित शिंदे यांनी स्पष्ट केले, “महापुरुषांचे पुतळे शासनाच्या नियमांनुसार परवानगी घेऊनच उभारावे. नियमबाह्य पद्धतीने पुतळा बसवल्यास कायद्याची आणि सुव्यवस्थेची समस्या निर्माण होते. कायदेशीर कारवाई केली जाईल.” तीन आठवडे आधी दत्तात्रेय पाटेकर, ओंकार चव्हाण आणि गजानन कृपाल यांनी ग्रामपंचायतीकडे परवानगीसाठी अर्ज केला होता, पण ग्रामपंचायतीने प्रशासकीय परवानगी घेण्याचे सांगितले होते.
गावात एक गटाने रस्ता रोको आंदोलन केले. महिलांसह ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. संपूर्ण दिवसभर तणावाचे वातावरण होते. प्रशासनाने पर्यायी जागेची तयारी केली, मात्र दोन्ही गट एकमत झाले नाहीत. सध्याची परिस्थिती अजूनही तणावपूर्ण आहे. पोलीस बंदोबस्त कायम असून, गावात कोणत्याही अनुचित प्रकाराला प्रतिबंध करण्यासाठी प्रशासन सतर्क आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या