*बार्शी (पांगरी) : प्रेमविवाहाच्या रागातून मेहुण्याकडून भाऊजीचा खून*
*बार्शी (पांगरी) : प्रेमविवाहाच्या रागातून मेहुण्याकडून भाऊजीचा खून*
*KDM NEWS प्रतिनिधी पांगरी (ता. बार्शी) : प्रेमविवाहामुळे मनात राग असलेल्या मेहुण्याने बहिणीच्या पतीला हॉटेलमध्ये जेवायला बोलावून दारूच्या नशेत बियरची बाटली फोडून गळ्यावर वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. २८ जानेवारी २०२६) रात्री सुमारे ८ वाजता पांगरीतील शिवनेरी हॉटेलमध्ये घडली.
मृतकाचे नाव सुशील दिलीप क्षीरसागर (वय २६, रा. अरणगाव, ता. बार्शी) असे आहे. आरोपी ऋषीकेश मरीबा क्षीरसागर (मृतकाचा मेव्हणा) असून, त्याने बहिणीच्या प्रेमविवाहाचा राग मनात ठेवला होता. घटनेच्या रात्री सुशील, त्याची पत्नी रेशमा, ऋषीकेश, त्याची मैत्रीण काजल निसाळ व इतर नातेवाईक हे हॉटेलमध्ये जेवणासाठी आले होते.
हॉटेलच्या मागील बाजूच्या वरच्या मजल्यावरील खोलीत जेवण करताना सुशील आणि ऋषीकेश यांच्यात दारू पिताना वाद झाला. वाद प्रेमविवाहाच्या मुद्द्यावरून तीव्र झाला. यात ऋषीकेशने हातातील बियरची बाटली फोडून सुशीलच्या गळ्यावर जोरदार वार केला. गंभीर जखमांमुळे सुशील रक्तस्त्रावाने जागीच कोसळला.
हॉटेलमालक व उपस्थितांनी तातडीने सुशीलला पांगरी ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथून बार्शीतील जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये हलवले गेले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी मृताचा चुलत भाऊ वैजिनाथ बंकट क्षीरसागर यांनी पांगरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी ऋषीकेश क्षीरसागर याला अटक केली असून, खुनाच्या गुन्ह्यात पुढील तपास सुरू आहे. परिसरात या घटनेने खळबळ उडाली असून, प्रेमविवाहाच्या मुद्द्यावरून कुटुंबातील वैमनस्य किती घातक ठरू शकते, याचे हे उदाहरण ठरले आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या