*“नोकरी मागणारे नव्हे, नोकरी देणारे बना!” बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेजमध्ये उद्योजकता विकास कार्यक्रमाची दमदार सुरुवात*
*“नोकरी मागणारे नव्हे, नोकरी देणारे बना!” बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेजमध्ये उद्योजकता विकास कार्यक्रमाची दमदार सुरुवात*
*KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, २३ फेब्रुवारी २०२६ : स्पर्धेच्या जगात केवळ पदवी पुरेशी नाही, कौशल्य आणि उद्योजकतेचा दृष्टिकोनही तितकाच महत्त्वाचा आहे. या उद्देशाने श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेजमध्ये आज उद्योजकता कौशल्य विकास कार्यक्रमाची सुरुवात झाली. हा एक आठवड्याचा उपक्रम २३ ते २८ फेब्रुवारी दरम्यान चालणार असून, विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर उद्योजक बनण्यासाठी प्रेरणा देणार आहे.
उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बार्शीचे प्रसिद्ध उद्योगपती गौतम शेठ कांकरिया उपस्थित होते. प्राचार्य डॉ. एस. बी. करंडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. व्यासपीठावर कार्यक्रम समन्वयक डॉ. बी. डी. लांडे, वाणिज्य विभागप्रमुख प्रा. के. बी. चपटे, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. एम. ए. ढगे, प्रा. एन. आर. सरफळे आणि इतर मान्यवर होते. महाविद्यालयातील शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होती.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमापूजनाने झाली. डॉ. लांडे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, विद्यार्थ्यांनी नोकरी शोधण्याऐवजी उद्योग सुरू करण्याकडे लक्ष द्यावे, हाच या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे.
कांकरिया यांनी मार्गदर्शन करताना उद्योगातील वास्तव सांगितले. “व्यवसायात नफा महत्त्वाचा असला तरी धैर्य, सातत्य आणि अपयश सहन करण्याची क्षमता आवश्यक आहे. कठोर वृत्ती न ठेवता परिस्थितीशी जुळवून घ्या आणि प्रयत्न करत राहा,” असे ते म्हणाले. त्यांनी स्वतःच्या अनुभवांवर आधारित कथा सांगून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.
प्राचार्य डॉ. करंडे यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना सांगितले की, शिक्षणासोबत कौशल्य आणि सकारात्मक विचार विकसित करा. या कार्यक्रमातील प्रत्येक सत्र तुमच्या भविष्याला दिशा देईल. ते म्हणाले, सर्व सत्रांत सक्रिय सहभाग घ्या आणि स्वतःच्या क्षमतांचा विकास करा.
कार्यक्रमात सॉफ्ट स्किल्स, तणाव व्यवस्थापन, व्यवसाय कायदे, करप्रणाली, उद्योजकतेतील संधी आणि आव्हाने यांसारख्या विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन होणार आहे. प्रत्येक सत्र विद्यार्थ्यांना उद्योग जगाशी जोडेल आणि आत्मनिर्भरतेकडे नेेल.
सूत्रसंचालन शिवानी पवार (बी. कॉम. भाग २) हिने केले. यश रणसुभे (बी. कॉम. भाग ३) याने पाहुण्यांची ओळख करून दिली. प्रा. सरफळे यांनी आभार मानले.
हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची जाणीव निर्माण करून स्वावलंबनाचा पाया रचेल. महाविद्यालयाचा हा प्रयत्न युवकांना नवीन ऊर्जा देणारा ठरेल.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या