पात्र शिधापत्रिकाधारकांना गौरी-गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे पात्र गरजू लाभार्थ्यांचा गौरी-गणपती उत्सव तसेच दिवाळी सण गोड होणार असून, जिल्ह्यातील तब्बल सात लाख ७८ हजार लाभार्थ्यांना या शिधा संचाचा लाभ होईल.
गौरी-गणपती उत्सवानिमित्त १ ते ३० सप्टेंबर या कालावधीत हा संच वितरित होणार आहे.
पात्र शिधापत्रिकाधारकांना एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर व एक लिटर खाद्यतेल या चार शिधाजिन्नसांचा समावेश असलेला एक शिधाजिन्नस संच प्रति शिधापत्रिका ई-पॉस प्रणालीद्वारे प्रतिसंच १०० रुपये या दराने वितरित करण्यात येणार आहे.
अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबाला (बीपीएल, पिवळे, प्राधान्य केशरी शिधापत्रिका) याचा लाभ होईल. राज्यातील एक कोटी ६५ लाख ६० हजार शिधापत्रिकाधारकांना हा आनंदाचा शिधा मिळेल. या खरेदीसाठी घाऊक बाजारातील दर व अनुषंगीक खर्चासह ४९३ कोटी रुपये शासन खर्च करणार असून, प्रतिसंच २३९ रुपये या दराने हा शिधा संच खरेदी होईल.
जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजनेच्या एक लाख ७५ हजार २१५ शिधापत्रिका, तर प्राधान्य कुटुंबाच्या सहा लाख ३८ हजार ४३४ शिधापत्रिका लाभार्थ्यांना आठ लाख १३ हजार संचाची मागणी करण्यात आली होती. अन्न व नागरी पुरवठा विभागाने सात लाख ७८ हजार २०३ शिधा संच मंजूर केले आहेत.सणासुदीत सर्वसामान्यांना अत्यावश्यक असणाऱ्या वस्तू आनंदाच्या शिद्यात मिळत असल्याने या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत होत आहे. दरम्यान, तालुक्यांच्या साठवण गोदामापर्यंत पुरवठा विभागातून हे संच पाठविले जात आहे. या संचातील शिधा जिन्नस खराब तसेच खाण्यास योग्य होण्याची मुदत चार महिन्याची असल्याची खात्री पुरवठा विभागाला करावी लागणार आहे.दिवाळीत दुसरा संच
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने सर्वप्रथम गेल्या वर्षी दिवाळीच्या सणानिमित्त तसेच या वर्षी गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त एप्रिलमध्ये हा आनंदाचा शिधा वितरित करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर आता गौरी-गणपती उत्सवानिमित्त पहिला संच वितरित होईल.
नंतर येणाऱ्या दिवाळीनिमित्त नोव्हेंबरमध्ये पुन्हा प्रतिशिधापत्रिका दुसरा शिधा संच १५ ऑक्टोबरपासून दिवाळीपर्यंत स्वतंत्ररीत्या वितरित करण्यात येणार आहे. त्यामुळे गोरगरिबांची दिवाळीही गोड होणार आहे. दरम्यान, सर्व पात्र लाभार्थ्यांनी आपापल्या रेशन दुकानातून हा शिधा प्राप्त करून घ्यावा, असे आवाहन पुरवठा विभागाने केले आहे.
तालुकानिहाय असे मिळणार शिधा संच (मागणीचे आकडेवारी)
नाशिक- ६८,७२९
धावीअ नाशिक- १,०१,०७८
त्र्यंबकेश्वर- २३,२६९
इगतपुरी -३१,७२९
दिंडोरी - ५०,१०२
सिन्नर - ४८,७१३
पेठ - २४,९५६निफाड - ७३,४१०
येवला - ३९,६७६
नांदगाव - २४,७१४
मनमाड - १६,४५३
चांदवड - ३५,६८२
मालेगाव - ६५,२२७
कळवण - ३८,६४६
बागलाण - ६१,०७७
देवळा - २५,५६२
धावीअ मालेगाव --५३,९२७
एकूण - ८,१३,६४९