मनोज जरांगेंचा राज ठाकरेंना सणसणीत टोला, एका वाक्यात विषय संपवला!
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी चलो मुंबईची घोषणा केली आहे. त्यांच्या आंदोलनावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कुणी तरी पाठीमागे आहे, असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेत, मराठा आंदोलन मोडत नाही, आम्ही मॅनेज होत नाही, असं म्हणत सणसणीत टोला मनोज जरांगेंनी राज ठाकरेंना लगावला आहे.'मराठा आंदोलनाच्या पाठीमागे कुणीतरी आहे, असा संशय राज ठाकरेंनी व्यक्त केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर आज मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
'राज ठाकरेंचं बरोबर आहे, मराठा आरक्षण आंदोलनाच्या पाठीमागे गोरगरीब मराठा समाज आहे. या आंदोलनाच्या पाठीमागे दुसर कोणीतरी असतं तर मागेच आंदोलन मोडलं असतं. ज्याचं घेतो ना त्याने कानाला धरलं की खाली बसावं लागतं. गोरगरीब मराठ्यांचा हा कार्यक्रम आहे, इथं गोरगरीब मराठ्यांची ताकद आहे म्हणून हे आंदोलन मोडत नाही, मॅनेज होत नाही. आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही, आरक्षण शिवाय यांना काहीच कळत नाही, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंवर पलटवार केला.
'याचिका टाकून कोणीही मराठा समाजाच्या आंदोलनाला थांबवू शकत नाही. कायदा आणि लोकशाही सर्वासाठी आहे. मराठा समाज हा कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी नाही तर उपोषण करण्यासाठी चालला आहे. तुम्ही शांततेत आम्हाला आंदोलन करू देणार नाही मग ही लोकशाही नाही असं घोषित करा, असा परखड सवाल मनोज जरांगेंनी उपस्थितीत केला.
'मराठा मुंबईत 100 टक्के 20 जानेवारीला अंतरवाली सोडून मुंबईत जाणार आहेत. आरक्षण सुद्धा घेऊन येणार आहेत आणि आंदोलन सुद्धा करणार, आम्हाला कुणीच रोखू शकत नाहीआम्हाला लोकशाहीने तो अधिकार दिला आहे. कुणी कितीही उड्या मारल्या तरी त्या चिखलात जाणार आहेत, असंही जरांगे म्हणाले.
'प्रकाश शेंडगे यांनी डुकरे आणि गाढव घेऊन यावं त्यांना कोण नाही म्हणाले. आम्हाला त्याची काही अडचण नाही आम्ही आमच्या लढ्यावर ठाम आहेत. ओबीसीतून आरक्षण घेणार 20 तारखेनंतर मुंबईला जाणार, मुंबईचे पाच दहा सर्वच मैदान आम्हाला लागणार आहेत, आम्ही शांततेत बसणार आहोत आम्हाला कोणीच रोखू शकत नाही कायद्याची चौकट म्हणून आम्ही काम करत नाही कायदा सुद्धा आमच्या बाजूने आहे' असंही जरांगे म्हणाले.
प्रकाश आंबेडकरांना प्रतिउत्तर
'ज्या मराठा समाजाच्या नोंदी कुणबी म्हणून ओबीसी आरक्षणात सापडले आहेत. ते वेगळं कसं घ्यायचं? आमच्या जर नोंदी सापडले आहेत, तर मग नेमकं घ्यायचं कुठं. नोंदी सापडल्या नसता तर ठीक होतं पण नोंदी सापडला तर काही केलं तरी त्याच ठिकाणी मिळणार आणि आम्ही तेच आरक्षण घेणार, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.
'आंदोलनाच्या नावाने पैसे गोळा करू नका'
आंदोलनाच्या नावाखाली पैसे कोणीही जमा करू नका. अजिबात कोणीही पैसे गोळा करू नका हे आंदोलन पैसे कमवण्यासाठी नाही तर हे गोरगरीब मराठ्यांना न्याय देण्यासाठी आहे. देणाऱ्याने त्यांचे पैसे माघारी घ्यावेत आणि माझ्या नावाने बोंबलू नये, असा इशाराही जरांगे पाटलांनी दिला.