सोशल मीडिया जपुन वापरा, नाहीतर होईल लाखांचा दंड ,तीन वर्षापर्यंत शिक्षा सायबर पोलिसांचे व्हिडिओ मेसेजवर लक्ष !

सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांनी आपण एकमेकांना प्रसारित करणारे मेसेज, व्हिडिओ, फोटो कोणालाही समजणार नाही हा गैरसमज मनातून काढून टाकावा. सोशल मीडियावरील प्रत्येक आक्षेपार्ह पोस्टवर (मेसेज किंवा फोटो, व्हिडिओ) पोलिसांच्या सोशल मीडिया नियंत्रण कक्षाकडून लक्ष ठेवले जात आहे.पोलिसांचे खबरे देखील अलर्ट झाले आहेत. काही दिवसांत पोलिसांनी २० जणांविरुद्ध कारवाई केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्हॉट्‌सॲप, फेसबूक, ट्विटर, इन्स्टाग्रामसह सोशल मीडियाच्या सर्वच प्लॅटफॉर्मवर सायबर पोलिस लक्ष ठेवून आहेत. एकाचवेळी असंख्य लोकांपर्यंत पोचण्यासाठी सोशल मिडियाचा वापर होतो. दुसरीकडे व्हॉट्‌सॲपवरूनही अनेकजण आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडिओ, मेसेज प्रसारित करतात. पण, ज्यातून सामाजिक शांतता व सुव्यवस्था बिघडू शकते, दोन गटात, जातीत, धर्मात वाद निर्माण होऊ शकतो, अशा बाबींवरही विशेष लक्ष ठेवले जात आहे. मोबाइल स्टेट्‌सद्वारे सांकेतिक भाषेतून मेसेज पोचविले जातात, त्यावरही विविध वेबसाईटद्वारे लक्ष आहे. त्यासाठी खबरी देखील कामाला लावले आहेत. दरम्यान, सोलापूर शहर पोलिसांनी खास सोशल मिडिया नियंत्रण कक्ष सुरू केला असून एक अधिकारी व चार कर्मचारी त्याठिकाणी नेमले आहेत. ग्रामीण पोलिसांनीही तसेच नियोजन केले आहे. 

मॉर्फिंग म्हणजे काय?

सायबर मॉर्फिंगमध्ये एखाद्या व्यक्तीचे मूळ छायाचित्र बदलले जाते. महिला किंवा तरुणींसह नेत्यांची छायाचित्रे डाउनलोड करून, अवमान होईल अशा प्रकारचे मॉर्फिंग करून ते वेबसाइटवर रिपोस्ट किंवा अपलोड करून बनावट प्रोफाइल बनविलेबनविले जातात. त्यावर आता शहर पोलिसांच्या सोशल मीडिया नियंत्रण कक्षाचे लक्ष आहे. दररोज सोशल मिडियावरील आक्षेपार्ह पोस्ट कोण प्रसारित करतो, याची माहिती पोलिसांकडून संकलित केली जात आहे. काही दिवसांत जवळपास २० जणांविरुद्ध शहर पोलिसांनी कारवाई केली आहे.

तेढ निर्माण करणाऱ्यास शिक्षेची तरतूद

सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो, मजकूर प्रसारित करणाऱ्यांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा-२०००अंतर्गत कलम ६७ नुसार कारवाई होवू शकते. तसेच बदनामीकारक मजकूर तथा फोटो व्हायरल करणाऱ्याविरुद्ध भारतीय दंड विधान कायद्याअंतर्गत कलम ५०२ नुसार संबंधितावर गुन्हा दाखल होतो. ज्याच्यावर गुन्हा दाखल होईल, त्याला एक ते दोन लाखांपर्यंत दंड होऊ शकतो. तसेच दोन ते तीन वर्षांची शिक्षा देखील होऊ शकते.

संबंधितावर पोलिसांकडून थेट कारवाई

सोशल मिडियाचा वापर करताना प्रत्येकांनी आपण पाठविलेल्या मेसेज किंवा व्हिडिओवरून दोन गटात, समाजात, धर्मात, जातीत तेढ निर्माण होणार नाही व सामाजिक वातावरण बिघडणार नाही, याची खबरदारी घ्यावी. तसेच सोशल मीडियावरील मेसेज प्रसारित करताना देखील प्रत्येकांनी त्याची खात्री करावी. जो कोणी असे कृत्य करतो, त्याच्या थेट घरी जाऊनपोलिस त्याच्यावर कारवाई करीत आहेत.

- एम. राजकुमार, पोलिस आयुक्त, सोलापूर शहर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाने घेतला तिघांचा बळी; धाराशिवच्या बावी गावात कुटुंबाचा करुण अंत**

**बार्शीत १३ वर्षीय मुलाचे अपहरण; पोलिसांचा शोध सुरू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल