५०३७ पाकिस्तानी नागरिक महाराष्ट्रात वास्तव्यास; १०७ नागरिक अदृश्य, ३४ बेकायदेशीर राहते - धक्कादायक माहिती उघड
५०३७ पाकिस्तानी नागरिक महाराष्ट्रात वास्तव्यास; १०७ नागरिक अदृश्य, ३४ बेकायदेशीर राहते - धक्कादायक माहिती उघड
KDM NEWS प्रतिनिधी | मुंबई | २६ एप्रिल २०२५ जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. केंद्र सरकारने पाकिस्तानविरोधात विविध कठोर निर्णय घेत असतानाच महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. राज्यात एकूण ५०३७ पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास असून यातील काहींचे व्हिसा कालबाह्य झाले आहेत, तर काही बेकायदेशीरपणे राहत आहेत.
पोलिस व सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, या नागरिकांपैकी १०७ जण अदृश्य आहेत. हे नागरिक भारतात आल्यावर संपर्कात राहिले नाहीत किंवा बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय नागरिकत्व मिळवण्याचा प्रयत्न केला आहे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय ३४ पाकिस्तानी नागरिक बेकायदेशीरपणे महाराष्ट्रात राहत असल्याचेही निष्पन्न झाले आहे.
नागपूर शहरात सर्वाधिक २४५८ पाकिस्तानी नागरिक राहत असून, यातील २५ जणांचा थांगपत्ता लागलेला नाही. ठाणे शहरात ११०६ पाकिस्तानी नागरिक आहेत. यापैकी ३३ नागरिक अदृश्य असून, ८ जण बेकायदेशीरपणे वास्तव्यास आहेत. जळगाव (३९३ नागरिक) आणि पिंपरी-चिंचवड (२९० नागरिक) या शहरांमध्येही मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास असल्याचे उघड झाले आहे.
पुणे जिल्ह्यात १११ पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, या नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले असून आतापर्यंत ३ पाकिस्तानी नागरिकांनी पुणे सोडले आहे.
दरम्यान, पुणे पोलिसांनी अलीकडेच २०१५ पासून बेकायदेशीरपणे राहणाऱ्या एका पाकिस्तानी नागरिकाला अटक केली. या व्यक्तीने बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय पासपोर्ट मिळवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना सांगितले की, "महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे राहत असलेल्या पाकिस्तानी नागरिकांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल. कोणालाही नियमांचे उल्लंघन करू देणार नाही."
केंद्र सरकारने पाकिस्तानशी असलेले सिंधू नदी पाणीवाटप करार, व्हिसा सेवा आणि राजनैतिक संबंध यावर देखील कठोर भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पोलिसांनी बेकायदेशीर आणि व्हिसा कालबाह्य झालेल्या परदेशी नागरिकांवर लक्ष केंद्रीत केले आहे.
सतर्कतेचे आवाहन
पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, जर कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी.
KDM NEWS Kiran mane